एप्रिलमध्ये उदगीर येथे राष्ट्रीय अधिवेशन : एस. एम. देशमुख
अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचा आदर्श जिल्हा व तालुका पत्रकार संघ पुरस्कार सोहळा दिमाखात संपन्न.
लोकसंधान टीम रिपोर्टर :

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदच्या वतीने आयोजित रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा व वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा कर्जत (रायगड) येथील रॉयल गार्डनमध्ये उत्साहात पार पडला. राज्यभरातील सातशेहून अधिक पत्रकार या सोहळ्यास उपस्थित होते. यावेळी पत्रकारांना एप्रिल महिन्यात उदगीर तालुक्यात होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात देशमुख म्हणाले की, पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी परिषद राज्यभर कार्यरत असून वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. दर दोन वर्षांनी होणारे राष्ट्रीय अधिवेशन यंदा उदगीर येथे होत असून ते अधिक प्रभावी करण्यासाठी सर्व पत्रकारांनी एकत्र यावे, असे त्यांनी आवर्जून सांगितले. कर्जत प्रेस क्लबने केलेल्या नियोजनाचे त्यांनी विशेष कौतुक केले.
या कार्यक्रमाला मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार सुरेश लाड, परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, विश्वस्त शरद पाबळे, किरण नाईक, दिपक कैतके, जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई, मंदार फणसे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, उपाध्यक्ष विशाल परदेशी, डिजिटल मीडियाचे अध्यक्ष अनिल वाघमारे, सरचिटणीस राहुल शिंदे, सहप्रसिद्धी प्रमुख भरत निगडे, मुंबई रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे, कार्याध्यक्ष संजय मोहिते, कर्जतचे उपनगराध्यक्ष संजय पाटील, माजी अध्यक्ष भारत रंजणकर, कोकण विभागाध्यक्ष अनिल भोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
ढोल-ताशांच्या गजरात स्वागत
मान्यवरांची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुक काढून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सजविलेल्या वाहनातून मान्यवरांचे आगमन झाले. परिषदेच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. प्रवेशद्वारावर कोकणातील पारंपरिक ‘बाल्या’ नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. महिलांनी औक्षण करून मान्यवरांचे स्वागत केले.

पत्रकारितेतील निर्भयतेचा आग्रह
जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी पत्रकारांनी ‘शोध पत्रकारिता’ अखंडपणे सुरू ठेवावी, नव्या तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करावे, असे सांगितले. परिषदेच्या माध्यमातून पत्रकारांच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
खासदार श्रीरंग बारणे यांनी जेष्ठ पत्रकारांना रेल्वे प्रवास सवलत मिळावी यासाठी दिल्ली येथे प्रयत्न केल्याचे सांगितले. पत्रकार अत्यंत कष्टाने आणि प्रसंगी जीव धोक्यात घालून कार्य करतात, याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
आमदार महेंद्र थोरवे यांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेची भूमिका अधोरेखित करत पत्रकारांनी निर्भयपणे विषय मांडावेत, असे आवाहन केले. कर्जत तालुक्यात पत्रकारांसाठी अद्ययावत पत्रकार भवन उभारणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर यांनी रायगड जिल्ह्यातील प्रेस क्लबच्या कामाचा गौरव केला. मंदार फणसे यांनी पत्रकारांनीही संघटित होऊन एकत्रितपणे भूमिका मांडावी, असे मत व्यक्त केले. विश्वस्त शरद पाबळे यांनी परिषदेच्या कामाचा आढावा मांडला, तर किरण नाईक यांनी डिजिटल पत्रकारितेच्या वाढत्या प्रभावाचा उल्लेख केला.

पुरस्कार वितरण –
यावर्षीचा ‘पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ’ पुरस्कार परभणी जिल्हा पत्रकार संघाला प्रदान करण्यात आला.
‘वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ’ पुरस्कार पुढील संघांना देण्यात आले :
बेला तालुका पत्रकार संघ, जि. नागपूर
चामोर्शी तालुका पत्रकार संघ, जि. गडचिरोली
नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघ, जि. नाशिक
पनवेल महानगर प्रेस क्लब, जि. रायगड
आंबेगाव तालुका पत्रकार संघ, जि. पुणे
किनवट तालुका पत्रकार संघ, जि. नांदेड
अंबाजोगाई तालुका पत्रकार संघ, जि. बीड
संग्रामपूर तालुका पत्रकार संघ, जि. बुलढाणा
पलूस तालुका मराठी पत्रकार संघ, जि. सांगली
मुंबई उपनगर पत्रकार संघ
यावेळी रायगड प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष अभय आपटे व मुरुड तालुका प्रेस क्लब यांचा शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
या भव्य सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी कर्जत प्रेस क्लबचे अध्यक्ष गणेश पवार, कार्याध्यक्ष विलास श्रीखंडे, सल्लागार विजय मांडे, अजय गायकवाड, राहुल देशमुख, अनिल जावळे, विद्यानंद ओव्हाळ, मल्हार पवार, अतुल माळी यांच्यासह अनेक पत्रकारांनी परिश्रम घेतले.
राज्यभरातील पत्रकारांच्या एकजुटीचा संदेश देणारा हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. आगामी राष्ट्रीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार संघटनांना नवे बळ आणि दिशा देणारा हा मेळावा ठरला.

