निरा येथे भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या चिंताजनक
सासवड येथील घटनेनंतर सावधगिरी बाळगण्याची गरज.
श्रद्धा जोशी.
निरा, ता. १ :
सासवड (ता. पुरंदर) येथे शुक्रवार (ता.२७) रोजी रात्री एका भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने एका लहान मुलासह चार महिलांचा चावा घेतला. त्यानंतर सासवड रुग्णालयात श्वानदंशाची लस त्यांना देण्यात आली मात्र सिरम लस देण्याची सुविधा तालुकास्तरीय रुग्णालयात नव्हती. त्यामुळे जखमींना सिरम लस घेण्यासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात जावे लागले. हे दोन्ही विषय गांभीर्याने घेण्याचे असून गाव, शहर स्तरावर योग्य त्या उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
पुरंदर तालुक्यातील निरा (ता.पुरंदर) हे गाव आता निमशहरी समजले जात आहे. मोठी बाजारपेठ तसेच वाढती लोकसंख्या यांमुळे येथे भटक्या कुत्र्यांची आणि डुकरांची संख्यादेखील वाढत आहे. भूतदयेपोटी अनेक लोक रात्रीच्या वेळी घराबाहेर भटक्या कुत्र्यांना खाऊ घालत आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी नेमक्या त्या वेळेला भटकी कुत्री गर्दी करताना तसेच खाण्यासाठी आक्रमक झालेली दिसत आहेत. निरेतील बाजार पटांगण, मार्केट यार्ड, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, शिंदेवस्ती, पालखी तळ, आरोग्य केंद्र परिसर तसेच रस्त्यांवर भटकी कुत्री फिरताना दिसत आहेत. आजवर कुत्रे चावण्याच्या तसेच लहान मुलांच्या अंगावर कुत्रे धावून जाण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. परंतु तरीही याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना होत नसल्याने आगामी काळात एखादी विपरीत घटना घडल्यास जबाबदार कुणाला धरायचे असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कमी व्हावा यासाठी दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी अद्यापही अनेक ठिकाणी होताना दिसत नसून न्यायालयाचा आदेश प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्था गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे. सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा उपद्रव होऊ नये यासाठी विशेष मोहीम राबविण्याची गरज आहे. यासाठी प्राणीमित्र, स्थानिक संस्था, सामाजिक संस्था यांनी न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने एकत्रित येऊन एखादी योजना बनवून तिची अंमलबजावणी केल्यास लवकर मार्ग निघेल अशी आशाही काही जाणकार व्यक्त करत आहेत.
सध्या गावस्तरावर तसेच निमशहरी व शहरी भागात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून येत आहे. सहसा कचरा टाकलेल्या भागात, बाजार पटांगणावर, खाऊच्या गाड्यांच्या भोवती, उकिरड्याच्या नजीक अशी अनेक भटकी कुत्री वावरत असतात. काही लोक कुत्रे पाळतात परंतु अशी कुत्री ठराविक काळासाठी घराच्या बाहेर इतरत्र मोकाट फिरत असतात. विशेषतः सकाळच्या वेळी दुचाकी व चारचाकी वाहनांचा पाठलाग करताना दिसतात. शाळेत जाणाऱ्या मुलांवर भुंकताना तसेच पाठीमागे धावून जाताना दिसतात. त्यात लहानमोठे अपघात देखील होतात. कुत्र्यांच्या आपसातील भांडणात ती अधिक आक्रमक होऊन जवळून जाणाऱ्या व्यक्तीवर हल्ला चढवतात.

एखादे भटके कुत्रे पिसाळले तर त्याचा उपद्रव इतर कुत्र्यांना होण्याचा वाढता धोका प्रशासनाने लक्षात घेण्याची गरज आहे. कुत्र्यांची नसबंदी करून त्यांना रेबीज प्रतिबंधात्मक लस देण्याची देखील आवश्यकता आहे.
भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येच्या प्रश्नाला हिवाळी अधिवेशनात वाचा फुटली होती. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय देखील चर्चेत राहिला. प्राणीमित्र संघटनांची मागणी आणि कुत्र्यांपासून होणारा उपद्रव यावर मार्ग काढून न्यायालयाने आपले म्हणणे नमूद केले. परंतु तरीही अद्याप प्रशासन या गोष्टी गांभीर्याने घेत नसल्याने परिस्थिती जैसे थे असल्याचे दिसत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने अलीकडे दिलेल्या निर्णयात, मानवसुरक्षा आणि प्राणी कल्याण यांचा समतोल राखण्यावर भर दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती व पशुसंवर्धन यंत्रणांनी समन्वयाने काम करून निर्बंधात्मक नव्हे तर शास्त्रीय आणि मानवी दृष्टिकोनातून प्रश्न हाताळावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणांवरून भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे व त्यांचे व्यवस्थित नियमन करण्याचे निर्देश दिले आहेत. तथापि काही प्राणीप्रेमी संघटना आणि नागरिक या आदेशावर संतुष्ट नाहीत. नसबंदी व लसीकरण केल्यानंतर त्यांना त्यांच्या मूळ परिसरात सोडले जावे असाही आग्रह आहे.
“आम्ही लोणंद, सासवड येथील नगरपरिषदेकडे डॉग स्क्वॉडबाबत चौकशी केली. हा प्रश्न गंभीर आहेच परंतु यासाठी सध्या भटक्या कुत्र्यांची नसबंदी करून त्यांना पुन्हा त्यांच्या अधिवासात सोडणे हा पर्याय आहे. याबाबत प्राणीमित्रांची भूमिका देखील विचारात घेऊन काम करावे लागते. प्रयत्न सुरु असून लवकरात लवकर उपाययोजना करू.”
– तेजश्री काकडे, प्रशासक, निरा ग्रामपंचायत
“याबाबत आम्ही राज्यातील विविध ठिकाणी चौकशी केली. परंतु, याबाबत ठोस मार्ग अद्यापपावेतो मिळाला नाही. कोकणात एका ठिकाणी असा प्रकल्प राबवला असल्याचे समजले आहे. तेथे माहिती घेण्याचे काम सुरु आहे. सध्या केवळ नसबंदी हाच उपाय आहे. परंतु त्यामुळे सद्यस्थितीत फारसा फरक पडणार नाही. त्यामुळे याबाबत ठोस उपाययोजना प्राणीमित्रांच्या सहकार्याने केली जाईल.”
– राजेश काकडे, निरा.

