…तर आमच्या कुटुंबाच्या इतिहासातील एक पान कायमचे मिटून जाईल !
पत्रकार प्रशांत ढावरे यांनी फेसबुकवर व्यक्त केल्या भावना
श्रद्धा जोशी.
निरा, ता. २५ :

या पुलाच्या घडणीतील दगडांवर शंकर ढावरे यांच्या हातांचा स्पर्श आहे. ते दगडाचे कोरीव काम करणारे निष्णात कारागीर होते. पुलाच्या दोन्ही बाजूंना उभे असलेले चार भव्य दगडी स्तंभ त्यांनी स्वतः घडवले आणि कमानीतील अनेक दगडांना त्यांच्या हाताने आकार मिळाला. त्यांनी केवळ दगड रचले नाहीत, तर आपला घाम, कौशल्य आणि आयुष्याचा मोठा भाग त्या बांधकामात ओतला.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत वारी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर निरा नदीवरील ब्रिटीशकालीन पूल पाडण्याचे आदेश देण्यात आल्याचे समजल्यावर निरा व पंचक्रोशीतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. यासह या पुलाच्या आठवणींनादेखील उजाळा दिला जात आहे. सोशल मिडीयावर अनेक प्रतिक्रिया उमटत असून पूल न पाडता त्याचे संवर्धन करण्याची मागणी जोर धरत आहे. दै. प्रभातचे पत्रकार श्री. प्रशांत ढावरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपल्या आठवणीना उजाळा दिला असून पूल पाडण्यात आला; “तर आमच्या कुटुंबाच्या इतिहासातील एक जिवंत पान कायमचे मिटून जाईल…” अशी भावनिक पोस्ट लिहिली आहे.
येथील पुलाचे बांधकाम ब्रिटीशकाळात पार पडले. त्यावेळी पाडेगाव, निरा, गुळुंचे पंचक्रोशीतील अनेक कारागीर या पुलाचे बांधकाम करत असल्याचे आता दिसत आहे. पाडेगाव (ता. फलटण) येथील शंकर ढावरे हे दगडाचे कोरीव काम करणारे निष्णात कारागीर होते. पुलाच्या दोन्ही बाजूंना उभे असलेले चार भव्य दगडी स्तंभ त्यांनी स्वतः घडवले आणि कमानीतील अनेक दगड त्यांच्या हाताने आकार घेतल्याचे प्रशांत यांनी नमूद केले आहे. त्यांनी केवळ दगड रचले नाहीत, तर आपला घाम, कौशल्य आणि आयुष्याचा मोठा भाग त्या बांधकामात ओतला. शंकर ढावरे यांच्यावर बाबासाहेबांच्या विचारांचा प्रभाव होता, म्हणूनच त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना शिक्षण देऊन या कष्टाच्या व्यवसायापासून दूर ठेवले. त्यामुळेच प्रशांत यांचे वडील आणि मोठे चुलते शिक्षक झाले, तर धाकटे चुलते वकील झाले.
नीरा नदीवरील ब्रिटिशकालीन संपूर्ण दगडी बांधकाम असलेला ऐतिहासिक पूल पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून धोकादायक ठरवून पाडण्याचे आदेश देण्यात आल्याचे समजताच अनेकांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली आहे. आज याबाबत निरा ग्रामपंचायत सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी अनेकांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. कोणत्याही परिस्थितीत पूल न पाडता त्याचे संवर्धन करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.
या पुलाच्या पश्चिमेला यापेक्षाही जुना रेल्वेचा दगडी पूल काही वर्षांपूर्वी ॲन्टी-श्रिंक सिमेंट ग्राउटींग करून अधिक मजबूत करण्यात आला आणि तो आजही रेल्वेच्या सेवेत दिमाखात उभा आहे. मग हा पूल का नाही वाचू शकत? पाडणे हाच एकमेव पर्याय कसा ठरतो? तांत्रिक दुरुस्ती, पुनरुज्जीवन आणि जतन या पर्यायांचा गांभीर्याने विचार का केला जात नाही? असाही सवाल ढावरे यांनी उपस्थित केला आहे.
“नीरा आणि पंचक्रोशीतील नागरिकांप्रमाणेच माझ्यासाठीही हा केवळ एक पूल नाही, तर आमच्या कुटुंबाच्या इतिहासाचा, आमच्या कष्टांचा आणि अभिमानाचा साक्षीदार आहे. मुळात हा पूल बहुतांश सातारा जिल्ह्याच्या हद्दीत येतो, तरीही तो पाडण्याचा आदेश पुण्याकडून कसा दिला जातो, हा प्रश्न माझ्यासह अनेकांना पडतो आहे. पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट नेमके कधी आणि कोणाकडून झाले, त्याचा अहवाल काय आहे, याबाबतही स्पष्टता नाही. इतक्या मोठ्या आणि ऐतिहासिक वारशाबाबत निर्णय घेताना पारदर्शकता असायला नको का?”
– प्रशांत ढावरे, (FB), पत्रकार, दै. प्रभात. लोणंद.
