दिलीप आबा म्हणजे नेतृत्व, दातृत्व आणि कर्तृत्वाचा त्रिवेणी संगम…
प्रा. कुंडलिक कदम यांची आठवणींची पाने
श्रद्धा जोशी
निरा, ता. ०२ –
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दिलीप यादव (आबा) यांचे बुधवार (ता.२४ डिसेंबर) रोजी निधन झाले. पुरंदरच्या परिसरात शिवसेनेला संघटनात्मक बळ देण्याचे काम यादवांनी केले. आमदार विजय शिवतारे यांचे ते निकटवर्तीय व विश्वासू सहकारी होते. दिलीप यादव यांच्याबद्दलच्या अनेक आठवणींना प्रा. कुंडलिक कदम यांनी उजाळा दिला आहे. प्रा. कदम यांच्या शब्दात सदर लेख ‘लोकसंधान’ मध्ये साभार प्रसिद्ध करत आहोत.
दिलीप आबांच्या निधनाची बातमी माझ्या गावाच्या व्हाॅट्सअप ग्रुपवर वाचली. खरंतर बातमी वाचून विश्वास बसेना. त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या लोकांशी फोनाफोनी केली. बातमी खरी होती. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मन सुन्न झाले. माझ्या वैयक्तिक जीवनातील एक आधारवड, एक हितचिंतक मी गमावला होता. आबांच्या अकाली जाण्याने पुरंदरच्या राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दिलीप आबा नेतृत्व, दातृत्व आणि कर्तृत्व यांचा त्रिवेणी संगम होते.
त्यांचा आणि माझा गेल्या पंचवीस वर्षाचा ऋणानुबंध होता. कॉलेजचे शिक्षण झाल्यावर मी माझ्या सहकारी मित्रांच्या मदतीने सामाजिक कार्याचा हेतू उराशी बाळगत गावात ‘श्रीनाथ तरुण मंडळाची’ स्थापना केली होती. मंडळाच्या कार्याचा आरंभ करण्यासाठी मार्गदर्शक मारुतीबाप्पू पिलाणे यांच्या माध्यमातून बापूसाहेब भोर आणि दिलीप आबा यांच्याशी स्नेह जुळला. पुढे तो अधिक वृद्धिंगत झाला.
आबा त्यावेळी श्रीनाथ कृपा सहकारी पतसंस्था चालवत होते. सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी लोकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत होते. राजकीय क्षेत्रातही काम करत होते. मी त्यांचा एक तरुण सहकारी मित्र म्हणून काम करत होतो. खरंतर त्या अगोदर आम्ही यादववाडी गावाच्या यात्रेत ढोल लेझीमचा खेळ घेऊन जायचो. त्यावेळी त्यांच्या मुंबईमधील ‘गोल्डन मित्र’ मंडळाकडून त्यांच्याविषयी ऐकले होते.
मंडळाच्या कार्याचा आरंभ सोहळा पार पडला. त्यानंतर सामाजिक काम करताना काम कसं करावे, याविषयी आम्हाला फार माहिती नव्हती. त्यावेळी बापूसाहेब भोर आणि आबांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे आपली स्वतःची एक छोटी का होईना ओळख कशी निर्माण करावी हे त्यांनी आवर्जून सांगितले. “कोणतेही विधायक काम तुम्हाला एक वेगळी ओळख निर्माण करून देते.”, हा सल्ला ते नेहमी देत असत. गावातील तरुणांच्या शक्तीचा विधायक वापर कसा करावा याविषयी ते नेहमी मार्गदर्शन करत होते.
राजकारण आणि समाजकारण करताना ते आमच्यासारख्या तरुण सहकार्यांशी नेहमी प्रेमाने वागत होते. विशेष म्हणजे ते नेहमी चांगला सल्ला देत होते. कार्यकर्ता निर्व्यसनी असावा हा त्यांचा एक वेगळा सल्ला होता. वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचा नेहमी संपर्क येत होता. त्यांना लोकसंग्रह करण्याची आवड होती. त्यांनी अनेक माणसं जोडली होती. लोकांच्या सुख – दुःखात ते नेहमी सहभागी होत. सामान्य माणसाशी त्यांची नाळ जोडली गेली होती.

मुंबई येथे बँकेत काम करताना आपणही एखादी पतसंस्था काढून आपल्या तालुक्यातील लोकांना अर्थपूरवठा करावा. त्याद्वारे त्यांना आर्थिकदृष्टया स्वावलंबी बनवावे या उद्देश्याने त्यांनी ‘श्रीनाथ कृपा’ ही संस्था सन १९९३ मध्ये सुरु केली. श्रीनाथ कृपा या सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक सामान्य माणसांना कर्जरूपाने पतपुरवठा करून अनेक लोकांचे जीवन सुसह्य केले. सामान्य माणसाला हमखास आणि सहजासहजी कर्ज उपलब्ध होतं होते. मुळातच सहकारात काम करणाऱ्या माणसाची वृत्ती सहकाऱ्याची असतेच. सहकार त्यांच्या नसानसात भिनलेला असतो. आबांनी संस्था निरपेक्ष भावनेने चालवली. राजकारण आणि संस्था यांच्यात योग्य समन्वय साधला. राजकारण आणि संस्था या दोन वेगळ्या गोष्टी आहेत याची जाणीव सतत त्यांना होती. चांगल्या सेवा, कर्जदार, ठेवीदार, सचोटी, प्रामाणिकपणा यांच्या जोरावर या संस्थेचा त्यांनी वटवृक्ष केला.
सन १९९३ मध्ये परिंचे (ता.पुरंदर) येथे सुरु केलेल्या संस्थेच्या आज अकरा शाखा आहेत. आपल्या परिसरातील लोकांना आर्थिक सक्षम करण्यासाठी त्यांनी त्याकाळी दूरदृष्टी ठेऊन उचलेल्या पावलातून त्यांची समाजाप्रती असलेली तळमळ दिसून येते. त्यांनी लोकांत संस्थेविषयी विश्वास निर्माण केला. संस्थेच्या माध्यमातून तालुक्यात अनेक रोजगाराच्या संधी निर्माण केल्या.
राजकीय जीवनात वाटचालीस करताना पुरंदरचे आमदार विजयबापू शिवतारे यांच्यासोबत पुरंदर तालुक्याच्या विकासात आबांचे योगदान महत्वपूर्ण आहे. आमदार विजयबापू यांचे पुरंदर तालुक्याच्या राजकारणात स्थान निर्माण करण्यात आबांचा मोठा वाटा आहे.
राजकारणात हार जीत होतं असते, पण या दोन्ही काळात तुमच वागणं हीच तुमची कमाई असते. आबांनी त्यांच्या राजकीय जीवनात या दोन्ही गोष्टीचा अनुभव घेतला आहे. या दोन्हीही काळात त्यांचं वागणं सामाजिक होते. त्यांच्या जीवनात सुद्धा अनेक चढ उतार आले, त्याला ते धीराने सामोरे गेले. ते नेहमी जमिनीवर राहणारे नेते होते. सामान्य जनतेशी त्यांची नाळ जोडलेली होती. या लोकांच्या प्रेमामुळे त्यांना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्यात नेतृत्व कारण्याची संधी मिळाली.
एक समाजभिमुख नेतृत्व त्यांच्या रूपाने तालुक्याला मिळाले.त्यांचे संघटन कौशल्य चांगले होते. एका छोट्या वाडीतून संघर्ष करून त्यांनी स्वतःला सिद्ध केले होते. एक मित्र म्हणून माझे आणि त्यांचे एक ऋणानुबंध होते. नोकरीनिमित्त मला गाव सोडावे लागले. पण आबांशी असलेले ऋणानुबंध कायम होते. आम्ही नेहमी संपर्कात होतो. माझ्या लेखनाचे ते नेहमी कौतुक करत असत. वेगवेगळ्या विषयावर माझ्याशी चर्चा करत असत. कधीही कोणत्याही कामासाठी फोन केला तर अगदी लगेचच ते काम मार्गी लावत असत. ज्यावेळी प्रत्यक्षात भेट होत होती, तेव्हा कुटुंबातील लोकांची आस्थेने चौकशी करत होते.
दरवर्षी जानेवारी महिन्यात त्यांचा वाढदिवस असतो. मागच्या वीस वर्षांपासून मी त्यांना प्रत्येक वाढदिवसाला ग्रीटिंग कार्ड पाठवत होतो. काळ बदलला आता ग्रीटिंग मिळत नाहीत, पण मी स्वतः हाताने ग्रीटिंग तयार करून आबांना पाठवत होतो. या वर्षी वाढदिवसाला आबा हयात नाहीत हे शल्य कायम मनात राहील.

एका चांगल्या नेत्याला आम्ही गमावलं आहे याची जाणीव सतत होतं आहॆ, एक चांगलं कुशल नेतृत्व तयार होण्यासाठी खुप मोठा कालखंड लागत असतो. विकास, समाज, समाजाचं हित समजणारी माणसं कमी होतं आहेत. असं असताना आबांसारखी माणसं अचानक जाणं दुःखद आहे. “आबा, तुम्ही जरी आमच्यात नसला तरी तुम्ही केलेले कार्य सतत तुम्हाला आमच्या स्मरणात ठेवेल यात शंका नाही.”

