मेढंगी जोशींचा आधारवड हरपला !
उपमुख्यमंत्री अजितदादांच्या निधनानंतर तरुणांची प्रतिक्रिया
श्रद्धा जोशी.
निरा, ता. २९ :
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल बुधवार (ता. २८) रोजी विमान अपघातात अकाली निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र हळहळला. चाहते, कार्यकर्ते, मित्र, कुटुंबीय, आप्त, नातलग, सर्वपक्षीय कार्यकर्ते दुःखी झाले. दादांच्या जाण्याने एका भटक्या जमातीच्या तरुणांवर दुःखाची कुऱ्हाड कोसळली आहे. दादा त्यांसाठी मोठा आधारवड होते. जाणून घेऊया नेमकी कहाणी…
मेढंगी जोशी ही भटकी जमात असून महाराष्ट्रात ठिकठिकाणी त्यांची वस्ती आढळते. बारामती तालुक्यातील मेडद येथे या समाजाची मोठी वस्ती आहे. भटकंती करत नंदीबैल घेऊन खेळ करणे हे त्यांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन. महिला गावोगावी जाऊन गोधड्या शिवतात. बदलत्या काळात नंदीबैल घेऊन फिरण्यासह पारंपारिकतेत बदल करत स्वामी समर्थांच्या नावे भिक्षा मागणे, भविष्य सांगणे, वासुदेवाचे सोंग घेणे अशी उदरनिर्वाहाची नवीन साधने या समाजातील तरुणांनी निवडली. पोटापाण्यासाठी सबंध महाराष्ट्रात भटकंती करताना हा समाज दिसतो.
सर्वच गावात सारखी परिस्थिती नसते. अनोळखी फिरणाऱ्यांना अडवले जाते. अनेकदा चोरीचा आरोप होतो. फिरस्त्या लोकांच्या अनेक व्यथा असतात. परंतु या फिरणाऱ्या मेढंगी जोशी समाजातल्या तरुणांना अजितदादांचा मोठा आधार असायचा. पश्चिम महाराष्ट्रासह इतर विभागात त्यांना अडवून विचारपूस केली असता ते बारामतीचे नाव सांगायचे. अजितदादांचे नाव सांगायचे. “आम्ही अजितदादांच्या बारामतीचे…” असे म्हणताच पुढच्या व्यक्तीचा रागावलेला आवाज शांत होई आणि त्यांना अडचणी येत नसत असे हे तरुण सांगतात. समजा मोठी अडचण आली तर ते दादांना संपर्कदेखील करत असत. दादा लगेच त्यांची अडचण सोडवत आणि “माझ्या बारामतीचे जोशी आहेत रे..” म्हणत. दादा गेल्यावर या तरुणांनी दादांना श्रद्धांजली वाहत एक फ्लेक्स लावला आहे. फ्लेक्सकडे पाहत बोलताना त्यांचे डोळे पाणावले होते.

दादांबद्दलच्या आठवणी सांगताना पदवीधर तरुण केशव गोंडे म्हणाला, “दादा म्हणजे देवमाणूस ! आमची माणसे कोणत्यापण गावात असली आणि काही अडचण आली की, आम्ही त्यांना आम्ही बारामतीचे आहोत असे सांगायचो. थोरले पवार साहेब आणि दादा आमची ओळख ! दादांचे नाव घेतले की आम्हाला समजून घेतलं जायचं. दादा गेल्याने आमचा आधारवड गेला!”

दादांबद्दल सांगताना अरुण वाकुडे म्हणाला,” आमचं शिक्षण नाही. आम्ही लांब लांब जाऊन भिक्षा मागतो. दादाचं नाव सांगितलं की आम्हाला अडचण येत नव्हती. मोठ्या अडचणीत आमची माणसे दादांना फोन लावायची. अडचण लगेच सुटायची. दादा म्हणजे आमची ओळख व्हती. दादा गेले आणि आमचा कैवारी गेला…”

