विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू
महाराष्ट्रभर हळहळ
श्रद्धा जोशी.
निरा, ता. २८ :
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात दादांसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईहून बारामती येथे प्रचारासाठी येत असताना हा अपघात झाल्याचे समजत आहे. राजकारणातील लाखो कार्यकर्त्यांचा एक आश्वासक चेहरा, एक स्पष्टवक्ता आज महाराष्ट्राने गमावला आहे. महाराष्ट्रभर हळहळ व्यक्त केली जात आहे.

अजित पवारांच्या मृत्यूची बातमी समजताच सर्वपक्षीय हळहळ व्यक्त केली जात आहे. ठिकठिकाणी राजकीय प्रचार बंद करण्यात आला आहे. कार्यकर्ते आपल्या भावनांना मोकळी वाट करून देत असून सोशल मिडीयावरदेखील दादांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वसामान्य लोकांसाठी पहाटे उठून रात्री उशिरापर्यंत काम करणारा कामसू नेता महाराष्ट्राने गमावला असल्याने सामाजिक व राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार सुनेत्रा पवार बारामतीच्या दिशेने निघाल्या आहेत. मोठ्या संख्येने कार्यकर्ते दवाखान्याबाहेर जमले आहेत. बारामतीसह राज्यातील दादांच्या चाहत्यांचे डोळे पाणावले असून राजकीय विरोधक देखील हळहळले आहेत. सामाजिक बांधिलकी जपणारा नेता हरपल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, विमान खाली येताना तिरके होऊन येत असल्याचे तसेच खरखर आवाज येत असल्याचे स्थानिक सांगत आहेत. तसेच लँडिंगपूर्वी विमानाने धावपट्टीच्या भोवती दोन फेऱ्या मारल्याचे देखील स्थानिक सांगत आहेत.

