पुरंदरमध्ये शिवसेनेचा थेट लढतीचा खंबीर निर्धार
ऐनवेळी दिग्गज नेत्याचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’!
श्रद्धा जोशी.
निरा, ता. २१ :
पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्याच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना शिंदे गटाने निवडणूक रणांगणात ठाम पावित्रा घेतल्याचे दिसून आले. शिवसेना व भाजपा युतीकडे अनेकांचे लक्ष लागून होते. त्याची तालुकाभर चर्चाही झाली. मात्र ऐनवेळी ही चर्चा फिस्कटल्याने भाजपाने स्वबळाचा नारा कायम ठेवला तर शिवसेना शिंदे गटाने देखील आपली शक्ती दाखवत प्रभावी व अनुभवसंपन्न उमेदवार निवडणुकीत उतरवण्याला प्राधान्य दिल्याचे दिसून आले.
भाजपसोबतची युती फिस्कटल्यानंतर कोणतीही राजकीय तडजोड न करता शिवसेनेने चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती गणांसाठी आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा करत थेट लढतीचा निर्धार केला आहे. एकला चलो रे! या पक्षांच्या भुमिकेमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी भाजपसोबत युतीसाठी प्रयत्न केले होते. मात्र भाजपकडून सर्व प्रस्ताव फेटाळण्यात आल्याने युतीची चर्चा अखेर निष्फळ ठरली. त्यातच काही दिग्गज नेत्यांनी ऐनवेळी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवल्याने शिवसेना शिंदे गटासमोर आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र अशा परिस्थितीतदेखील शिवसेनेने मागे प्रभावी उमेदवार रिंगणात उतरवून आपली ताकद दाखवून दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार –
जिल्हा परिषद उमेदवार :
निरा–कोळविहीरे गटातून भारती अतुल म्हस्के, बेलसर–माळशिरस गटातून रमेश इंगळे, वीर–भिवडी गटातून समिर जाधव, तर दिवे–गराडे गटातून ज्योती राजाराम झेंडे यांना शिवसेना शिंदे गटाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
पंचायत समितीचे उमेदवार :
पंचायत समिती पुरंदर अंतर्गत निरा गणातून रेखा नितीन केदारी, कोळविहिरे गणातून शितल सतिश साळूंखे, माळशिरस गणातून शरद यादव, बेलसर गणातून माणिक निंबाळकर, वीर गणातून प्रविण जगताप पाटील, भिवडी गणातून सागर मोकाशी, दिवे गणातून बाळासाहेब मगर , तर गराडे गणातून सुप्रिया विशाल रावडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
शिवसेना शिंदे गटाने जाहीर केलेल्या या यादीमुळे पुरंदर तालुक्यातील निवडणूक प्रचाराला मोठा वेग मिळाला असून, इतर राजकीय पक्षांच्या हालचालींनाही चालना मिळाली आहे. आता पुरंदरमध्ये निवडणूक लढत अधिक चुरशीची आणि थेट संघर्षाची होणार असून मतदार कुणाला कौल देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

